नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत .मागील लेखात आपण शिवरायांचे स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा व राजमुद्रा पहिली . तरी या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरवात कशी केली? ते पाहणार आहेत .तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा .
तोरणगड :-
शिवरायांकडे पुणे , सुपे , चाकण व इंदापूर या भागाची सुभेदारी होती . परंतु या जहागिरीतील सर्व किल्ले आदिलशहाच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते . शिवरायांना माहीत होते की किल्ल्याशिवाय आपल्या राज्याची ताकत वाढत नाही व जर आपल्याला आदिलशाही व मुघल असल्या मोठ्या ताकटवर राज्यांसोबत लढायचे असेल तर गड-किल्ले जिंकणे गरजेचे आहे . त्यांनी किल्य्यांचे महत्व ओळखले होते . परंतु त्यांना सुरवात कुठून व कशी करावी हे लक्षात येत नव्हते . या वेळेस त्यांना मार्गदर्शन केले ते म्हणजे आई जिजाबाई यांनी .
जिजाबाई यांनी शिवाजींना किल्ले तोरणा बद्दल सांगितले . पुण्याच्या नैऋत्येस 64 किमी वर हा किल्ला आहे . कानद खोऱ्यातील हा डोंगरी किल्ला आहे . या किल्ल्या वरील 2 भक्कम माच्या ( झुंजार माची व बुधला माची ) या किल्ल्याला मजबुती देतात .किल्ल्यावर वरती जाण्यास एकच मार्ग आहे व तोही खूप कठीण आहे . महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा व बळकट किल्ला म्हणून तोरणा किल्याची ओळख आहे . या किल्ल्यावर देवी तोरणजाईचे मंदीर आहे . हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता . परंतु या किल्ल्याकडे लक्ष कमी होते या कारणामुळे किल्ल्यावर मुबलक प्रमाणत सैनिक व दारुगोळा नव्हता . या कारणामुळे तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधण्याचे शिवरायांना ठरवले .
![](https://stayupdatedindia.com/wp-content/uploads/2020/12/Torana-Fort.jpg)
निवडक मावळ्यांसह शिवराय कानद खोऱ्यात उतरले . सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झटपट तोरणा चढले . मोक्याच्या ठिकाणी लवकर कब्जा केला . वर थोड्या लढाईनंतर लगेच किल्ला राज्यांच्या हाती आला . तानाजी मालुसरे , येसाजी कंक हे त्या वेळी राज्यांच्या सोबत होते . या किल्ल्याला शिवरायांनी “ प्रचंडगड ” हे नाव दिले . तोरणा किल्ल्याचा कारभार राजांनी सुरू केला . किल्ल्यावर किल्लेदार , सुबनीस , कारखानीस यांच्या नेमणुका केल्या . किल्याची डागडुजी सुरू केली . त्या वेळस चमत्कार म्हणा किंवा संजोग म्हणा मोहरांनी गच्च भरलेल्या 4 घागरी सापडल्या . आई भवानीचा आशीर्वाद एका प्रकारे या कार्याला लाभल्याचा हा एक संकेतच होता . आई भवानी हे शिवरायांचे दैवत होते .
हे धन राजांनी हत्यार जमवणे , दारुगोळा खरेदी करण्यासाठी वापरला . उरलेल्या धनातून राजांना एक दुसरा बेत फत्ते करायचा होता . तो म्हणजे तोरण्यापासून थोड्या जवळच असलेला मुरुंबदेवाचा डोंगर काबीज करणे .
स्वराज्याची पहिली राजधानी :-
मुरुंबदेवाचा डोंगर हा खूप उंच , मोक्याच्या ठिकाणी व अवघड होता . आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता . त्यामुळे या ठिकाणी पहारा कमीच होता . हा डोंगर काबीज करणे शिवरायांनी ठरवले .
काही निवडक साथीदारांनसह राज्यांनी हा गड सहज ताब्यात घेतला व तोरण्यावर सापडलेल्या धनाचा या किल्ल्याच्या पुनरचनेसाठी कामी आणले . या गडावर राजवाडा , बारा महाल , अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली . या किल्ल्याला राजांनी “ राजगड ” हे नाव दिले . राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी झाली .
या नंतर स्वराज्याच्या घोडदौडीला जास्तच वेग आला . बारा मावळातील किल्ल्यामागून किल्ले राजे ताब्यात घेत होते . गावोगाचे पाटील , देशमुख शिवरायांना मुजाऱ्याला येऊ लागले . काही लोकांच्या तक्रारी मात्र आदिलशहाच्या कानी गेल्या .
चातुर्य शिवरायांचे :-
आदिलशहाला शिवरायांच्या हलचालींबद्दल समजले . यांचे उत्तर त्याने शहाजी राजांना विचारले . सुरवातीला शहाजीराजे पेचात पडले परंतु निभावून नेण्यासाठी त्यांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की ‛ जहागिरीचे रक्षण करण्यासाठी किल्ल्याची गरज असल्या कारणाने किल्ले घेतले असावे . ’ या हालचालींची शिवरायांना खबर पोहचली . त्याना आत्ताच कोणते संकट नको होते . तर त्यांनी आदिलशास एक निरोप पाठवला . ‛ जहागिरीचा कारभार व्यवस्तित चालवा यासाठी आम्ही किल्ले घेतले आहेत . ते सर्व आपलेच आहेत . व यात आदिलशाहीचे हित आहे . ’ या कारणाने आदिलशाह खुश झाला व त्यांनी राजांना काही काळ मोकळीक देऊन टाकली .
या नंतर राजांनी कोंढाणा व पुरंदर हे मोक्याचे किल्ले जिंकून घेतले . या नंतर युक्तीने राजांनी रोहिडा किल्ला ताब्यात घेतला व स्वराज्याची घोडदौड जोरात चालू राहिली .
पुढील लेखात आपण स्वकीय शत्रूंचा पराभव व स्वराज्याची दुसरी राजधानी पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …
[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]